पराधीन आहे जगती ......    

कधी कधी भूतकाळातील भूत
माझ्या मानगुटीवर बसतं  अन् 
 मला विचारतं   .....
त्या प्रसंगी  तू असा का वागलास?
तुझा निर्णय  कसा काय  चुकला?
तुझे कौशल्य, अक्कल हुशारी , बुद्धीमत्ता कोठे गेली होती त्या वेळेस ?
तुझा नशीबावर अवलंबून न राहण्याचा अहंभाव कोठे गेला होता त्या क्षणी?
मी हसून त्यास उत्तर देतो
अरे बाबा ... मान्य काही गोष्टी नियतीच्या, नशीबाच्याच  हातात असतात
ती जशी आपल्याला चालवते, खेळवते
तसे आपण चालतो, खेळतो
असे जर असले नसते   तर ....
राज्य घटिका समीप आलेल्या रामाला वनवासाला जावे लागले नसते
पराक्रमी पांडवासमोर द्रौपदी चे वस्त्रहरण  झाले नसते
प्रत्यक्ष कृष्णाला आपल्या जन्मदात्या आईला सोडून यशोदेकडे रहावे लागले नसते
सकारात्मक विचारसरणिची  पुष्टी जोडत वर परत मी त्यास  सांगतो .....
राम वनवासाला गेला नसता तर सीतेचे अपहरण झाले नसते आणि क्रूर रावणाचा वध झाला नसता
 द्रौपदी चे वस्त्रहरण झाले नसते तर  युद्ध होवून त्यात दूष्ट कौरवांचा नाश झाला नसता
कृष्ण यशोदाघरी सुरक्षित राहिला नसता तर कृष्णाच्या हातून कपटी  कंस  मारला गेला नसता
माझ्याही हातून नियतीला काही चांगले घडवून आणावयाचे असेल .
म्हणून नियतीचे काही फटके  खावे  लागले  असतील भूतकाळात
हे ऐकून भूतकाळाचे भूत खळाळून हसतं  अन  अदृश्य होतं
अगदी विक्रम राजाच्या वेताळासारखं  !!!

महेश भा. रायखेलकर

Comments

Popular posts from this blog