रागाचे व्यवस्थापन ‘ मी फार रागीट आहे !’. ‘मला फार लवकर राग येतो !’. ‘त्या परिस्थितीत मी रागावयचं नव्हतं तर काय करायचं होतं?’. ‘मी रागवू नको तर काय करू?. ‘रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’. या सारखी वाक्य बोलून प्रत्येकजण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास हानीकारक आहे हे एकाद्यावेळेस माहित असूनसुध्दा तो रागाचे बोट सोडण्यास तयार होत नाही. रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागवता देखील आपण आपले जीवन जगू शकतो. ते कसे साध्य करावयाचे हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम माणसास राग का येतो?. त्या मागची कारणीमिमांसा जर आपण नीट समजुन घेतली तर त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला सहज सोपे जावू शकेल. माणसाला राग खालील काही कारणामूळे येतो. १. माणसाला जसे हवे असते तसे जेव्हा घडत नाही तेव्हा त्यास राग येतो. २. आपण इतर लोकांबद्द्ल आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. इतरांनी कसे असले पाहीजे?. त्यांनी आपल्याशी कसे वागले पाहीजे?. पण प्रत्यक्षात लोकांचे आपल्याशी वागणे, आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार हा आपण आपल्या मनात तयार केलेल्या प्रत...